ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे ठरले “जायंट किलर”

नाशिक : लोकसभेच्या निवडणूकीची घोषणा झाली तरी नाशिक चर्चेत होते आणि लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तरी नाशिक चर्चेत आहे. याला कारण म्हणजे अनपेक्षितपणे शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मुसंडी मारत विजयश्री आपल्याकडे खेचून आणल्याने. नाशिक लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्या-झाल्या ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करत बाजी मारली यादरम्यान महायुती उमेदवार जाहीर न करता चाचपडत राहिली. यावेळी अनेक नावे चर्चेत आली आणि गेली. यादरम्यान भुजबळांचे नाव केंद्राने उमेदवारीसाठी सुचवले .त्यात बराच उशीर झाला. पण भुजबळांच्या नावावर एकमत होत नव्हते आणि नंतर नाराज झालेल्या छगन भुजबळांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली. यामुळे ओबीसी समाजात जो मेसेज पोहचायचा तो पोहचला आणि महायुती विषयी ओबीसी समाजात प्रचंड नाराजी पसरली. इकडे प्रचाराला अगदी काही दिवस शिल्लक असताना शिंदे गटाने हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यात मुख्यमंत्री यांनी रंगत आणत नाशकात रॅली काढली व तीन वेळेस मुख्यमंत्री नाशकात येऊन गेले. त्यांनी भेटीगाठी करत निवडणूक प्रतिष्ठेची केली .त्यानंतर गोडसे हे खासदारकीची हॅटट्रिक करणार की वाजे “जायंट किलर” ठरणार याचे कोडे होते. मात्र नाशिककरांनी मतदानाच्या माध्यमातून कोडे सोडवत ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांच्या विजयावर अखेर शिक्कामोर्तब केला. निकालाच्या सुरवातीपासून वाजे आघाडीवरच होते. सुरवातीच्या पोस्टल मतदानात देखील वाजे पुढे होते. 14 व्या फेरीत वाजे यांनी 1,47,012 मतांची आघाडी घेतली. हा लीड कायम ठेवत 18 व्या फेरीत 1,78,000 मतांची गोळाबेरीज केली. त्यानंतर नाशिक शहर, सिन्नर, इगतपुरी, भागात एकच जल्लोष करण्यात आला .नाशिककरांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या हेमंत गोडसे यांना नाकारत ठाकरे गटाच्याच राजाभाऊ वाजे यांना निवडुन देत, पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या असली शिवसेनेचाच नाशकात आवाज घुमणार हे दाखवून दिले.

![]()














