बंड शमविण्यात महायुतीला मोठे यश !

नाशिक : भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेला थोड्याफार प्रमाणात हायसे वाटले आहे. विधानपरिषद निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर महायुतीमध्ये अनेक ट्विस्ट आले. अधिकृतपणे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस उलटून गेल्यानंतरही महायुतीमधील बंडखोरी शमवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. यादरम्यान मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न करून देखील यश येत नसल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेत टेन्शन होते. मात्र आज नाट्यमय घडामोडी घडत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे हे थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी दाखल झाले. मुख्य म्हणजे, शिंदे गटाच्या शिवसेनेच्या या दोन्ही मंत्र्यांसोबत भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे हे देखील उपस्थित होते. या दिग्गज नेत्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर प्रसाद हिरे यांनी महायुतीच्या हितासाठी माघार घेत असल्याचे जाहीर केले. यामुळे महायुतीसमोरील एक अडथळा दूर झाला आहे. दरम्यान, नाशिकमधील बंडखोरीच्या माघारीवरच जळगाव निवडणुकीचा तिढा अवलंबून आहे. याठिकाणी भाजपची चिंता अजूनही कायम आहे. येथे भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र शिंदे गटाच्या शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. काळे यांची समजूत काढण्यासाठी महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांनी अनेक बैठका घेतल्या, मात्र त्यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आता नाशिकमध्ये प्रसाद हिरे यांनी माघार घेतल्यामुळे, जळगावातही या बंडखोरीचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना आहे. तर दुसरीकडे भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू व बंडखोर गोकुळ गीते यांनी नागरिकांच्या भेटी गाठी सुरू केल्या आहेत यादरम्यान पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारला असता मंत्री गिरीश महाजन म्हणाले की गोकुळ गिते यांच्यासोबत फोनवर चर्चा सुरू आहे त्यामुळे आज रात्रीपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याचेही ते म्हणाले.

![]()















