वारंवार वीजपुरवठा खंडित होणे नेहमीचेच…

नाशिक :इंदिरानगर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आता नवीन राहिले नाही दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, पुन्हा येतो पुन्हा जातो हा खेळ तर कधी कधी दिवसभर सुरू असतो. यामुळे इंदिरानगर परिसरातील नागरिकांना मनस्ताप तर सहन करावाच लागतो मात्र आता इलेक्ट्रिक वस्तू खराब होऊन आर्थिक नुकसान देखील होऊ लागल्याने नागरिकांनी जावे तरी कोणाकडे हा प्रश्न उपस्थित होऊ पाहत आहे. असाच प्रकार काल रात्री (बुधवार) 10 वाजता घडला सुरवातीला 5 मिनिटांच्या अंतरावर 4 ते 5 वेळेस वीजपुरवठा खंडित झाला आणि त्यानंतर तर वीजपुरवठा पुन्हा खंडित झाल्याने आणि वारंवार खंडित होणाऱ्या विजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी भारतनगर परिसरातील सबस्टेशनवर हल्लाबोल करत रात्री दगडफेक करण्यात आली. यात संतापलेल्या जमावाने एका वीज कर्मचाऱ्यास मारहाण केली तर दुसऱ्यास धक्काबुक्की करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. .महत्वाचे म्हणजे भारत नगर, दिपालीनगर, वडाळा गाव, विनयनगर, साईनाथ नगर, इंदिरानगर येथील अर्धा भागात कायमच वीजपुरवठा खंडित होत असतो. यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात वैतागून जातात. काल रात्री सुद्धा 10 वाजेच्या दरम्यान वीजपुरवठा खंडित झाला तर सकाळी 10 वाजेच्या दरम्यान वीज पुरवठा सुरळीत झाला. काल नाशिक शहराचे तापमान 42 अंश सेल्सिअस इतके होते, यावेळी होणार उकाडा, घामाच्या धारा, व अक्षरशः जीवाची लाई-लाई होत असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची झोप उडाली, लहान मुलांना देखील मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागला. मुख्य म्हणजे हा सर्व प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून नागरिक सहन करत आहेत. या परिसरात सत्ताधारी पक्षाचे 4 नगरसेवक, सत्ताधारी पक्षाचा आमदार तर काही महिन्यांपूर्वी तर महापौर देखील याच परिसरातील असताना देखील हा प्रश्न सुटू शकत नाही. हेच इंदिरानगरवासीयांचे दुर्दैव म्हणावे लागेल. काल रात्री जो त्रास इंदिरानगर येथील नागरिकांनी सहन केला तो, अनेक वर्षांपासून सहन करावा लागतो आहे. बाहेर गावाहुन आलेले पाहुणे देखील आता उचभ्रू वस्ती असलेल्या इंदिरानगरला कायम लाईट जाणारा ग्रामीण भागातील परिसर म्हणू लागले आहेत. मुख्य म्हणजे वीज वितरण कंपनीच्या 7875624813 या क्रमांकावर फोन केला तर एकतर बिझी येतो किंवा बंद दाखवतो ,ऐन उन्हाळा त्यात उकाडा त्यात दुर्दैव म्हणजे वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात घामाच्या धारा गाळाव्या लागतात. तांत्रिक बीघाड होऊ शकतो मात्र रोज-रोज, याचे उत्तर देणे अधिकाऱ्यांना अपेक्षित आहे. कारण नागरिक हजारो ररुपयांचे लाईट बिल भरतात, बिल भरले नाही तर त्या मिनिटाला न सांगता वीज मीटर काढून नेले जाते, मग नेहमी वीजपुरवठा खंडित का होतो याचे उत्तर व त्यावर उपाय हा झालाच पाहिजे. कारण शांत असलेल्या नागरिकांचा संयम कधी सुटेल हे सांगता येणे अवघड आहे,हे लोकप्रतिनिधी यांनी देखील समजून घेतले पाहिजे.

![]()














