
(महेश गिरमे ,संपादक) भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो .भाजपमध्ये खळबळ करायला आणि वळवळ करायला फारशी संधी नसते. पक्षाचे जे प्रमुख नेते ठरवतील ते अमलात आणणे एवढेच नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हाती असते. तर दुसरीकडे ठाकरे गटाची शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांनी धनुष्य बाण हाती घेत शिवसेना काबीज करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद पटकावले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. ही निवडणूक शिंदे गटाच्या शिवसेनेला म्हणावी तितकी सोपी आणि सरळ नाही. सध्याच चित्र बघता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शक्ती स्वतःच्या पक्षातील ताण, तणाव,रुसवे, फुगवे घालविण्यातच वाया जात आहे.सध्या 4 विद्यमान खासदारांच तिकीट कट झाल्याने त्याच्याबरोबर काही ठिकाणी जाहीर झालेले खासदारच बदलल्याने इतर खासदारांच्या मनात चलबिचल सुरू आहे. मुळात जे 13 खासदार त्यांच्याबरोबर आलेत तेच आता शिंदेंची डोकेदुखी ठरू पहात आहे. मुख्य म्हणजे त्या खासदारांना बरोबर घेताना एकनाथ शिंदे यांनी त्यांना शब्द दिला होता कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. मात्र आता तर अन्याय सुरू झाल्याने आणि तो देखील खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोरच, आणि अन्याय करतो तरी कोण मित्र पक्ष म्हणवणारेच त्यामुळे त्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. मुळात जो शब्द देतो त्यालाच सर्वाधिक त्रास होतो, आणि शिंदे यांचा स्वभाव पाहता ते कुणाला दुखावण्याचा, नाही म्हणण्याचा त्यांचा मूळ स्वभाव नाही .मात्र आता त्यांना त्रास होत असणार हिंगोलीत हेमंत पाटील यांना आधी उमेदवारी दिली आणि नंतर ती कापली तर दुसरीकडे सतत पाच वेळेस खासदार असलेल्या भावना गवळी यांचा पत्ता कट करत त्या ठिकाणी (यवतमाळ-वाशीम) हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री यांना तिकीट देण्यात आले. मुख्य म्हणजे 2019 मध्ये शिवसेना-भाजपा युतीच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत दक्षिण नांदेड मध्ये त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या तरी पाच वेळेस खासदार असणाऱ्या भावना गवळी घरी का बसल्या याचाच विचार शिंदे गटातील नेते व कार्यकर्ते करत असणार. मात्र यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली असणार हे नक्की , तर दुसरीकडे शरद पवारांबरोबर खेळी करत अजित पवार भाजपात गेले मात्र त्यांना शिंदे गटा इतक्या जागा मिळतील याची शक्यता कमीच दिसते. मात्र अजित पवार यांनी भाजपाच्या सुरात-सूर मिळवलेला दिसतो, याची कारणे अनेक असू शकतात. आता अजित पवार यांची खरी किंमत दिल्लीतच ठरू शकते. त्याला कारण म्हणजे सुप्रिया सुळे यांचा पराभव, इतकं मात्र खरं की अजित पवारांपेक्षा शिंदे गटाचीच चर्चा अधिक होणार शिंदे गटातील खासदारांची तिकिटे कशी कापली गेली ती, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत नॅशनल पक्ष असलेल्या कॉग्रेसची स्थिती अत्यंत वाईट दिसते आहे या ठिकाणी कॉग्रेस पूर्णपणे ठाकरे गटाच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शरण गेली आहे. याठिकाणी ठाकरे गट आणि शरद पवार गटाने मोठ्याप्रमाणात जागा आपल्या ताब्यात ठेवल्याने कॉग्रेसने आपल्या हाती आलेली(अधिक जागा खेचण्याची) सुवर्णसंधी गमावली आहे. याचा नफा-तोटा निकालानंतर कळेलच. उत्तरेकडील राज्यांमध्ये मोदी जादू चालू शकते मात्र महाराष्ट्रात सध्या थोड्या फार प्रमाणात हे अवघड वाटत असल्याने फक्त मोदींच्या जादूने 40 चा आकडा करता येणार नाही. याची पुरेपूर कल्पना भाजपा नेत्यांना आल्याने ते आता विविध प्रयोग करून पहात आहेत, यामध्ये राज ठाकरे, एकनाथ खडसे हे या प्रयोगांचे भाग असू शकतात. मात्र राज ठाकरे हे चाणाक्ष नेते असल्याने ते काय निर्णय घेतात याकडे राजकीय नेते व मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. लवकरच विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहे यामध्ये अनेकांना शब्द दिले जातील, अनेकांचे राजकिय गणित सुधरवले अथवा बिघडवले जाईल म्हणजेच लॉलीपॉप दाखवले जातील. एकीकडे भाजपाने विरोधकांची शक्ती कमी-कमी करत आणली आहे मात्र महाराष्ट्रात तरी विरोधकांचा ‘आवाज’ कमी झालेला नाही. या आवाजाचा परिणाम निकाल लागल्यानंतर कळेल मात्र आजच्या घडीला महाराष्ट्रातील राजकारण बघून जनता निवडणुकीकडे आधीसारखी बघेल का हे मोठे प्रशचिन्ह आहे कारण महाराष्ट्रात एका पक्षाचे दोन-दोन पक्ष झालेले , त्यातदेखील एका मित्र पक्षाचा उमेदवार दुसऱ्या मित्र पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवत आहे.(नितीमुल्य पायदळी तुडवत) त्यामुळे गोधळ निर्माण झाला असून या गोधळाला जनता किती स्वीकारते ते 4 जून नंतर कळेलच मात्र सर्व नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला तरच…

![]()















खूप छान लेख आहे