महाआघाडीत रंगला कलगीतुरा

नाशिक : राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. 2019 भाजपा बरोबर निवडणूक लढवणारी शिवसेना कॉग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जाऊन मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान होतील याची कोणी कल्पना देखील केली नव्हती. राजकारणात एन्ट्री करणाऱ्या प्रत्येक नेत्याला मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडत असतात. उपमुख्यमंत्री दोन असू शकतात मात्र मुख्यमंत्री हा एकच असतो. अनेक मोठ्या नेत्यांना क्षमता असूनदेखील मुख्यमंत्री पद मिळू शकले नाही . मात्र नशीबवान ठरले ते नारायण राणे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि आता एकनाथ शिंदे, …लोकसभा निवडणूक संपली आता विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांची संख्या आता वाढणार आहे . आमचाच मुख्यमंत्री होणार असे महायुती व महाआघाडीतील नेते दावे करत आहेत महाआघाडीत तर सध्या मुख्यमंत्री पदावरून मोठा कलगीतुरा रंगला आहे. लोकसभेत महाराष्ट्रात सर्वात जास्त खासदार आमचे निवडून आले आहेत त्यामुळे विधानसभेच्या जास्त जागा देखील आम्हाला मिळतील असे कॉग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सांगत आहेत. तर नाना पटोले म्हणतात आमच्या जास्त जागा तर मुख्यमंत्री देखील आमचाच असणार. मात्र या दाव्यामुळे ठाकरेंची शिवसेना भडकली असून खा. संजय राऊत म्हणतात लोकसभेत कॉग्रेसच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. इतकेच काय तर राऊत म्हणतात लहान भाऊ मोठा भाऊ,मधला भाऊ, असे कोणी म्हणत असेल महाराष्ट्रातील भविष्यातील चित्र वेगळे असू शकते असा दमच त्यांनी कॉग्रेसला भरला आहे. तर सुरवातीला आम्ही मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये नाही म्हणणारे शरद पवार म्हणतात की निवडणूक संपल्यावर व कोणाच्या जागा जास्त याचा विचार करून मुख्यमंत्री बनवू ,पवारांच्या या विधानामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची तोंड दाबून बुक्यांचा मार अशी अवस्था झाली आहे. तर इकडे महायुतीत सर्वानाच मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. मध्येच भाजपा नेते म्हणतात देवा भाऊ मुख्यमंत्री होणार तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री नाराजी व्यक्त करून भावी मुख्यमंत्री शिंदेच असणार असे सूनवतात तर मधेच अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकतात सध्या लाडकी बहीण वरून देखील जोरदार खेचा-खेची सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी देखील नशीब लागते आजच्या अस्थिर राजकारणात मुख्यमंत्री पदी कोण बसणार हे सांगता येणे अवघड असून होऊ शकते भविष्यात स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे, अन्यथा ठाकरे परिवारातील कोणीही असू शकते. कारण स्वप्न कोणीही पाहू शकतात आणि ते पाहण्याचा अधिकार सर्वांचा आहे. इतके मात्र खरे की शरद पवार यांनी आपले संपूर्ण लक्ष पश्चिम महाराष्ट्रावर केंद्रित केले असून याठिकाणी अनेक नेते तुतारी वाजवण्यास तयार आहेत. तर कॉग्रेसचे लक्ष मराठवाडा विदर्भ याकडे असून ठाकरेंचं लक्ष मुंबई, कोकण, नाशिक जिल्हा याकडे असणार असून हेच मार्ग मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचू शकतात हे नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. मात्र महायुती असो की महाआघाडी यांना एकीनेच लढावे लागणार तरच यश सोप्पे असणार आहे.

![]()















