नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या खड्यांचे काय ?

नाशिक : येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे हे लक्षात घेता सत्ताधारी पक्षात असलेल्या नेत्यांनी कामाचा धडाका लावला आहे. त्यातल्या त्यात नाशिक शहरावर सत्ताधारी आणि विरोधकांचे प्रेम अधिक आहे. काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांनी नाशकात बैठक घेतली .तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या काही तासातच अनेक कामांचा धडाका लावला. तर घोषणांचा पाऊस देखील पाडला यामध्ये अनेक ठिकाणचे भूमिपूजन देखील करण्यात आले यावेळी मुख्यमंत्र्यांनी लवकरच वाढलेल्या घरपट्टीतुन सुटका करून नाशिककरांना गुड न्यूज देण्याचे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले.त्याचबरोबर सिडकोतील पाच योजनांमधील 32 हजार रहिवाशांना लहान-मोठ्या कामांसाठी सिडको कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात, त्यादेखील कमी होऊन सिडको लवकरच फ्री-होल्ड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आता या दोन्ही घोषणा कधी पूर्ण होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे. एकीकडे नाशिक शहरात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व अनेक सत्ताधारी नेते असताना दुसरीकडे मात्र शहरातील नागरिक खड्यांपासून वाचण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतानाचे चित्र दिसत होते. नाशिक-पुणे रोड, जेलरोड, इंदिरानगर सातपूर आणि भागातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूकही रस्त्यांमुळे खीळ-खिळी झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे वाहने रस्त्यात चालवताना आदळत असल्याने चालक आणि प्रवाशी पाठदुखी, मणकादुःखी कंबरदुःखीने त्रस्त झाली आहेत. त्याचबरोबर गाड्या खराब होऊ लागल्याने तो खर्च वेगळा असल्या अनेक अडचणीत नाशिककर सापडला आहे. महापालिकेच्यावतीने शहरात नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, सिडको, सातपूर, नाशिकरोड या विभागाततील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो मग निधी कोणत्या खड्यात जातो म्हणजे वापरला जातो. यामध्ये ठेकेदारांची चांगलीच मजा होत आहे. मात्र दुसरीकडे अनेकांना या खड्यांमुळे जीव गमवावा लागला आहे इतकेच काय तर आता झालेल्या पावसात रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. इतकी दयनीय अवस्था याआधी नाशिकची कधी बघण्यात आली नसल्याचे जुने-जाणते सांगतात एकीकडे मंत्री घोषणांचा पाऊस पाडतात तर दुसरीकडे नागरिकांना खड्यातून गाडी चालवणे देखील अवघड होते. मुख्य म्हणजे नाशिक महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे.या खड्यांमुळे नाशिककर संतापला आहे हे तितकेच खरे आहे.

![]()














