भुजबळांचे “बळ” कमी करत माणिकराव कोकाटेना दिली चाल

नाशिक : महायुतीच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात नाराजांचे फटाके वाजण्यास सुरवात झाली. मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यानंतर भुजबळ नाराज झाले आणि त्यांनी सरळ-सरळ पक्षप्रमुख अजित पवार यांच्यावर टीकेचे बाण सोडले मात्र अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया न देता राजकीय डावपेच खेळत झालेल्या खातेवाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे कृषी खाते गेले. विशेष म्हणजे कृषी खात्याची जबाबदारी अजित पवारांनी नाशिक जिल्ह्यातील माणिकराव कोकाटे यांच्याकडे देत भुजबळ यांचे “बळ” कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आहे.कृषी खाते जितके राज्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे तितकेच नाशिकच्या दृष्टीने देखील महत्वाचे आहे कारण कांदा आणि द्राक्षाच्या नावानेच नाशिक ओळखले जाते. वेळोवेळी या दोन गोष्टींसाठी नाशिकच्या शेतकऱ्यांनी आंदोलने करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत देखील कांदा प्रश्नावरून रणकंदन होऊन महायुतीच्या उमेदवाराला पराभवाचे तोड बघावे लागले होते. त्यामुळेच महत्वाचे असणाऱ्या या खात्याची जबाबदारी माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळे या खात्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष आपली पाळे-मुळे अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यात मतभेद असल्यामुळे अजित पवार यांनी खेळी करत कोकाटे यांना चाल दिली असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे.खाते वाटपानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कोकाटे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र या बॅनरवरून छगन भुजबळांचा फोटो गायब असून. त्यांच्याऐवजी भुजबळ यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचा फोटो लावण्यात आला आहे, त्याचबरोबर शहरात मंत्रिपद मिळालेल्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवरून देखील भुजबळ यांचा फोटो गायब आहे. या लावण्यात आलेल्या बॅनरची जोरदार चर्चा नाशिक जिल्हात सुरू आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या पुढील वाटचालीवर राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.

![]()















