नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना आज मुंबईला पाचारण,उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत चर्चा

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या धक्क्यातून भाजपा अजूनही सावरली नसून आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षाच्या वतीने जपून व सावधगिरीने पाऊले टाकली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या आमदारांसाठी भाजपाने गुप्त मतदान घेतल्यानंतर आज नाशिक जिल्ह्यातील सर्व अध्यक्ष आणि सचिवांना बोलावण्यात आले असून आज रात्री कोणत्या आमदाराचा पत्ता कट करायचा, किंवा कोणत्या विद्यमान आमदाराला पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरावयाचे याबाबत चर्चा होणार आहे. आज दोन राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत यादरम्यान महाराष्ट्रातील विधासभेच्या निवडणुकांच्या हालचाली देखील गतिमान झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत सर्व्हेच्या नावाखाली उमेदवारांच्या घोषणा उशिरा झाल्याने याचा मोठा फटका महायुतीला बसला नाशकात देखील हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला उशीर झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेला याची किंमत मोजावी लागली. त्यामुळे ही चूक भाजपा सुधारत असून येत्या काही दिवसात सर्वच 160 जागा निश्चित करण्याची शक्यता आहे. भाजपाने पूर्ण महाराष्ट्रात गुप्त मतदान पध्दत वापरी असून आता मतदान झालेल्या पेट्या मुंबईत उघडणार असून प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा वेळ देण्यात आला आहे, नाशिक शहरातील तीन मतदारसंघांसाठी गुप्त मतदान झाले होते याचा अंतर्गत अहवाल विचारात घेत तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, सचिव यांना बोलावण्यात आले असून आज रात्री 10 च्या सुमारास नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना वेळ देण्यात आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर तीनही मतदारसंघाची चर्चा होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षातील जेष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत या बैठकीकडे तीनही आमदारांचे लक्ष लागून आहे.


![]()















