ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे युतीबाबत खा. संजय राऊत यांचे संकेत

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाची शिवसेना मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यांच्या युतीच्या चर्चांमुळे सत्ताधारी महायुतीचे टेन्शन वाढले आहे. राज्यातील आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवणार असल्याच्या चर्चांही जोर धरू लागल्या आहेत.दोन्ही पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये ठाकरे बंधूनी एकत्र येण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अलीकडेच उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या भेटीगाठींमुळे युतीचे संकेत मिळत असतानाच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी युतीबाबत मोठे विधान केले आहे. दोन्ही ठाकरे बंधु आगामी महापालिका निवडणुका एकत्रितपणे लढवतील असे संकेत त्यांनी दिले आहेत.नाशिक दौऱ्यावर असताना मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण अशा ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र निवडणुका लढवतील. या सर्व महानगरपालिकांबाबत आमच्यात चर्चा सुरू आहे. आता कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसाची वज्रमुठ कोणीही तोडू शकत नाही. असे संजय राऊतांनी म्हटलं आहे. यांच्या या वक्तव्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. याआधी शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी नाशिक महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवलेला आहे. त्यामुळे नाशकात मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेची युती झाल्यास महायुती मधील शिंदे गटाच्या शिवसेनेचे टेन्शन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महायुतीमधील घटक पक्ष एकत्र लढणार की वेगवेगळे यावर देखील अनेक गणिते अवलंबून असणार आहेत. भाजपाने याआधीच नाशिक महानगरपालिकेसाठी 100 प्लस चा नारा दिला आहे.

![]()















