३५ पैकी तब्बल ३१ माजी नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडली

नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर हवेत असणारी महाविकास आघाडी मात्र विधानसभेच्या निवडणुकीत धाडकन जमिनीवर आली आणि महायुती सत्तेत आली. मात्र विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यातच नाशिक शहरात ठाकरे गटाच्या शिवसेनेला जोरदार धक्के बसण्यास सुरवात झाली.मुख्य म्हणजे नाशिकची जबाबदारी ठाकरे गटाचे फायरब्रॅंड नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे असताना मोठे धक्के नाशकात ठाकरे गटाला सहन करावे लागत आहे.आजच्या घडीला महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असताना आणि कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपला असताना नाशिकमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र हकालपट्टीचा सिलसिला सुरू असल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे.सुरवातीला ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर त्यानंतर महानगरप्रमुख विलास शिंदे आणि आता ठाकरे गटाचे नव्यानेच झालेले महानगरप्रमुख मामा राजवाडे, उपनेते सुनील बागुल यांची हकालपट्टी करण्याची वेळ ठाकरे गटाच्या शिवसेनेवर आली आहे. मुख्य म्हणजे ही नेतेमंडळी नाशिक शहरातील मातब्बर म्हणून ओळ्खली जातात.सुनील बागुल भाजपमध्ये जाणार याची कुणकुण ठाकरे गटाला लागल्यानंतर ठाकरे गटाने खेळी करत सुनील बागुल यांचे निकटवर्तीय मामा राजवाडे यांना तातडीने महानगरप्रमुख पदाची जबाबदारी देत बागुल यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी निर्धार शिबिर पार पडले होते. त्या वेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह निष्ठावान नेत्यांनी हजेरी लावून शिवसैनिकांमध्ये उभारी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र या शिबिरात पक्षात नवचैतन्य निर्माण होण्याऐवजी पक्षाला गळती लागत मोठमोठे धक्के बसू लागले. सन 2017 मध्ये अखंड असलेल्या शिवसेनेत 35 नगरसेवक होते.त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली असता शिंदे गटाच्या शिवसेनेत 26 नगरसेवक गेले. तर भाजपमध्ये 5 नगरसेवकांनी प्रवेश केला तर आज फक्त ठाकरे गटाच्या शिवसेनेत 4 नगरसेवक उरले आहेत. काही दिवसात एक जिल्हाप्रमुख, दोन उपनेते आणि दोन महानगरप्रमुखांच्या हकालपट्टीची वेळ ठाकरेंच्या शिवसेनेवर का आली ? याचा विचार करण्याची वेळ पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर येऊन ठेपली आहे. कारण पक्ष कुठलाही असो प्रामाणिक कार्यकर्त्यांपेक्षा ठेकेदाराना पक्ष मोठे करत असेल तर याची किंमत प्रत्येक पक्षाला आज ना उद्या मोजावीच लागणार हे निश्चित…

![]()















