सुकलेल्या व वाकलेल्या झाडांमुळे सोसायट्यांना मोठा धोका

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे त्याचबरोबर आग लागण्याच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून असाच प्रकार इंदिरानगर येथील सायकल ट्रॅक येथे घडला. आज दुपारी 2 वाजेच्या दरम्यान सायकल ट्रॅक मध्ये असलेल्या वाळलेल्या गवताला आग लागली किंवा लावण्यात आली हे समजू शकले नाही मात्र सुरवातीला किरकोळ वाटणाऱ्या आगीने थोडयाच वेळात रौद्र रूप धारण केल्याने हळूहळू परिसरात आग पसरण्यास सुरवात झाली. परिसरात मोठ्या प्रमाणात सुकलेली झाडे आणि पालापाचोळा असल्याने आग भडकली मात्र सायकल ट्रॅक शेजारी असलेल्या बंगला मालकांनी, जवळपास असलेल्या सोसायटीच्या सदस्यांनी प्रसंगावधान राखत लागलेल्या आगीवर नळीने व इतर भांड्याने पाणी टाकण्यास सुरवात केल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

याठिकाणी जॉगिंग ट्रॅक वरील आग विझवत असतानाच अचानक नारळाच्या झाडाला देखील आग लागल्याने परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली. मात्र यादरम्यान सोसायटीच्या गच्चीवरून पाण्याचा मारा केल्याने थोड्याफार प्रमाणात आग विझण्यास मदत झाली.यावेळी बऱ्याच वेळाने अग्निशमन दलाचे जवान व पोलीस घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आग विझवली. यादरम्यान परिसरातील सोसायटी व बंगलाधारक सदस्यांनी ही आग विझवली नसती तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती कारण या ट्रॅकला लागून सोसायट्या आहेत. यामध्ये कुठलीही जीवित हनी झाली नाही. मात्र ही आग कोणी लावली हे समजू शकले नसून याठिकाणी वडाळा त्याचबरोबर समोर असलेल्या ऑफिस मधील अनेकजण सिगारेट पिण्यासाठी येत असल्याची परिसरात चर्चा आहे. सायकल ट्रॅक कमी गावगुंडांचा ट्रॅक जास्त हा सायकल ट्रक अनेक समस्यांनी वेढला गेला असून अनेक वर्षांपासून याठिकाणी निलगिरीचे मोठी-मोठी झाडे आहेत. यातील काही सुकली असून काही बाजूलाच असलेल्या सोसायट्यावर वाकलेली आहेत. यामुळे पावसाळ्यात याठिकाणी मोठी घटना घडण्याची शक्यता असून सुकलेल्या झाडांना आग लागण्याची भीती तर वाकलेली झाडे सोसायट्यांवर पडण्याची भीती रहिवासी व्यक्त करत असून या झाडांच्या फांद्या कमी करण्यासाठी अनेकदा नगरसेवक, अधिकारी यांना सांगण्यात आले मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची रहिवाशांनची तक्रार आहे.याठिकाणी मोठी घटना झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. रात्रीच्या सुमारास अंधार असल्यामुळे अनेक कपल्स, दारू पिणारे याठिकाणी येऊन बसतात. अनेकदा याठिकाणी जोरदार भांडणे देखील होत असतात त्यामुळे हा सायकल ट्रॅक कमी आणि त्रासदायक ट्रॅक जास्त वाटू लागला असून या सायकल ट्रॅकला मोठे गेट नसल्याने कार देखील याठिकाणी पार्किंग केली जाते. त्याचबरोबर याठिकाणी दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्यांचा खच पडला आहे. या ठिकाणी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत असून हाकेच्या अंतरावर असलेली पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

![]()















