क्षुल्लक राग आणि जीवन बरबाद…

नाशिक : नाशिक शहराची ओळख संपूर्ण भारतात तीर्थक्षेत्र म्हणून असताना गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहरात हत्यांची मालिका सुरू झाली झाली आहे. अगदी किरकोळ कारणांवरून शहरात खून होऊ लागल्याने नाशिकची ओळख क्राईम सिटी म्हणून होऊ लागली आहे. या महिन्यात चक्क किरकोळ कारणातून तीन तरुणांचा खून करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पंचवटी परिसरातील मेरी- रासबिहारी लिंकरोडवर मोकळ्या जागेत रिक्षाचालक प्रशांत तोडकर याचा खून करून मृतदेह टाकून देण्यात आला होता. मुख्य म्हणजे तोडकर याचा खून त्याच्याबरोबर असलेल्या काही मित्रांनीच केला जुना वाद काढला आणि दगडाने ठेचून खून करण्यात आला. तर शुक्रवारी जुने नाशिक नाईकवाडी पुरा भागातील उत्कर्ष इमारतीसमोर काही युवक क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू वारंवार दुकानात येत होता त्यामुळे त्यांना समजवण्यास जितेंद्र गुलाबसिंग ठाकूर(रा, नाईकवाडी पुरा) गेले असता त्यांच्या डोक्यात संशयित सनी मोजाड याने बॅटने प्रहार केला. यामुळे ठाकूर हे जागीच कोसळून बेशुद्ध झाले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जितेंद्र ठाकुर हे एका खाजगी बँकेत नोकरीला होते. संशयित सनी याने बॅटने चार ते पाच वेळा प्रहार केल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिसरी घटना काल रात्री बारा वाजेच्या दरम्यान भारतनगर परिसरात घडली या खुनाला देखील कारण किरकोळ होत वडाळा रोड भागातील भारतनगर येथे राहणाऱ्या परवेज अय्युब शेख(31,रा. भारतनगर) याने स्वतःचा मोबाईल त्याचा मित्र अकिब इद्रिस सय्यद (30,रा भारतनगर) याच्याकडे गहाण ठेऊन 4,500 रुपये घेतले होते त्याने मोबाईल पुन्हा मागितला असता दोघांमध्ये वाद झाला यावेळी भारतनगर येथील मोकळ्या मैदानात अकिब याने परवेज याच्यावर धारधार शस्त्राने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी दंगल नियंत्रण तैनात केली होती रात्री उशिरापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हे सर्व खून अगदी किरकोळ कारणांवरून झाले असून खून करणारे मित्र किंवा ओळखीचे आहेत मात्र क्षणिक येणाऱ्या रागामुळे तरुण आपल्या संपूर्ण आयुष्याचे नुकसान करून घेत आहेत हे थांबले पाहिजे.


![]()














