महापालिकेच्या मनमानी कारभाराला राष्ट्रीय हरित लवादाने लावला चाप

नाशिक : नाशिकच्या तपोवनात साधुग्राम उभारणीसाठी १८२५ झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या मनमानी कारभाराला राष्ट्रीय हरित लवादाने तात्पुरती स्थगिती देऊन तपासासाठी संयुक्त समिती नेमली आहे.होऊ घातलेल्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारणीसाठी तपोवनातील झाडे तोडण्याच्या तयारीत असणाऱ्या नाशिक महानगरपालिकेला राष्ट्रीय हरित लवादाने चाप लावला आहे. कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तपोवन परिसरातील झाडे तोडण्यास तात्पुरती मनाई केली. या संदर्भात तातडीने संयुक्त समिती स्थापन करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कायदेतज्ज्ञ श्रीराम पिंगळे यांनी हरित लावादमध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हरित लवादाने तात्काळ निकाल देत तपोवनातील वृक्षतोड थांबवण्याचे आदेश दिले आहे. नाशिक महानगरपालिकेला आदेश देत या परिसरातील एकही वृक्ष तोडू नये ,त्याच बरोबर वृक्षतोडी बाबतचा अहवाल, तसेच त्या ठिकाणी करण्यात येत असलेल्या MICE हबचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेत काय म्हटले आहे?
याचिकाकर्ते श्रीराम पिंगळे यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हंटले आहे आहे की जून २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या वृक्षतोडीच्या बदल्यात मनपा प्रशासनाने १७ हजार झाडे लावण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात ती रोपे लावली नसल्याची परिस्थिती याचिकेत मांडली आहे. ग्रीन बिल्ड’च्या नावाखाली नदीपात्रात बांधकाम….
साधुग्रामासाठी प्रस्तावित MICE हबच्या निमित्ताने, ग्रीन बिल्डिंग संकल्पनेच्या नावाखाली नदीपात्रात ‘रीक्रीएशन सेंटर’ उभारले जात असल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. “कुंभमेळ्याच्या नावाने हे बांधकाम का?” असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, प्रकरणावरील पुढील सुनावणी १५ जानेवारी रोजी असून नाशिक महापालिकेच्या संबंधित पाच अधिकाऱ्यांना आपली बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सोबतच न्यायालयाने स्वतंत्र समिती गठित करून वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या दोन्ही समित्यांची अहवाल १५ जानेवारीला सादर करावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

![]()















