सर्वच राजकीय पक्षांना मतदारांचा सवाल

नाशिक : आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच पक्षांचे इच्छुक कामाला लागले असून पक्ष देखील उमेदवार चाचपणी करत असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इच्छुकांना तिकीट मिळणार का ? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. शहरात गेल्या काही वर्षात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते मात्र पोलीस खात्याने नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम राबविल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे. त्याचबरोबर प्रत्येक पक्षांमध्ये थोड्या बहुत फरकाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व्यक्ती आहेत. मुळात अनेक पक्षातील नेत्यांच्या ते जवळचे आहे. अनेकदा वाढदिवस असो की इतर कार्यक्रम यामध्ये बॅनर वर यांचे फोटो झळकत असतात. त्यामुळे सामान्य मतदार देखील नाराज असतो. मागील निवडणुकांमध्ये अनेक पक्षांनी अशा उमेदवारांना तिकीट दिले होते आणि याची चर्चा देखील झाली होती .गुन्हेगारी छटा असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिल्यास मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे जेष्ठ नागरिक म्हणतात. त्याचबरोबर चांगल्या प्रतिमेचे एकनिष्ठ कार्यकर्ते यामुळे मागे राहतात त्यामुळे एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय कधी मिळेल आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना पक्ष बाहेरचा रस्ता कधी दाखवला जाईल याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या व्यक्तींना कोणताही राजकीय पक्ष, मग तो महायुतीमधील असो वा महाविकास आघाडीमधील, तिकीट देणार का? नेत्यांनी अशा गुंडांना यापुढे पाठबळ देऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

![]()















