विधानसभा निवडणुक ठरली वादाची किनार

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीसंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक शिवसेना (उबाठा)च्या शालिमार येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.मुख्य म्हणजे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर या बैठकीला विशेष महत्व होते. त्याचबरोबर या बैठकीत रस्त्यावरील खड्डे, वाढती गुन्हेगारी, अनियमित पाणीपुरवठा, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयांवर चर्चा सुरू होती. मात्र या बैठकीत मूळ विषय बाजूला पडत ठाकरे गटाच्या शिवसेनेतील महत्वाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे बघायला मिळाले. हा वाद विधानसभा निवडणुकीवरून झाल्याचे समजते. बैठकीत प्रमुख पदाधिकारी आपले विचार व्यक्त करत होते. यावेळी ठाकरे गटाचे दिंडोरीचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे भाषणासाठी उभे राहिले. त्यांनी भाषणाच्या शेवटी विधानसभा निवडणुकीचा विषय घेत. नाशिक मध्यमधून वसंत गीते यांचा पराभव झाला. या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी एमडी ड्रग्जसह इतर मुद्दे आपण नीट हाताळले नाही. तो मुद्दा जर प्रचारात घेतला नसता तर आपला विजय झाला असता, असे त्यांना म्हटले. आणि याच ठिकाणी वादाला तोंड फुटले.त्याचवेळी वसंत गिते यांचे अगदी जवळचे मित्र समजले जाणारे माजी महापौर विनायक पांडे हे उभे राहीले. कारण वसंत गिते व विनायक पांडे या दोघांनी मिळून प्रचाराची संपूर्ण रणनिती आखली होती. त्यावरुन विनायक पांडे हे दिंडे यांच्या वक्तव्यावर संतापले. विनायक पांडे म्हणाले जर 40 वर्षांमध्ये आम्ही आमचा लढा देत होतो, तर आम्ही 40 वर्ष नेमकं केलं काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यादरम्यान विनायक पांडे हे आपल्या समर्थकांसह कार्यालयातून संतापून बाहेर गेल्याचे पाहायला मिळाले.त्यानंतर जयंत दिंडे यांनी संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माफी देखील मागितली. यादरम्यान मनसे नेते दिनकर पाटील यांनी पांडे यांना थांबवण्याचा देखील प्रयत्न केला होता.आता या वादाची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.

![]()















