दारणा धरणातून होणार पाण्याचा विसर्ग

नाशिक : काल रात्री पासून नाशिक शहरात जोरदार पाऊस सुरू असून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे.नाशिकची ओळख असलेल्या दुतोंडया मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहचले असून इतर छोटी मंदिरे देखील पाण्याखाली गेली आहेत. हवामान खात्याने आज नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असल्याने पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदीच्या लगत असलेल्या बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजी विक्रेते व इतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरवात केल्याचे चित्र आहे.दारणा धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून धरण 50 टक्के क्षमतेने भरले आहे त्यामुळे आज दारणा नदीतून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.दारणा धरणातून ११०० क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दारणा नदीकाठच्या रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसाने त्र्यंबकेश्वर शहरातील रस्ते जलमय झाले असून त्र्यंबकेश्वर गावातील अनेक भागातील रस्त्यांवर पुराचं पाणी आले आहे. तर अनेक घर आणि वाड्यांमध्ये देखील पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. नाशिक शहरातील देखील अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळते आहे.

![]()















