घाटाच्या सरंक्षक भितींचे काही काम अपूर्ण असल्यामुळे अपघात

नाशिक : आज दुपारच्या सुमारास सप्तशृंगीगड येथील गणपती घाटात इनोव्हा कार १००० ते १२०० फुट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान सदर इनोव्हा कारमध्ये एकूण सात प्रवाशी होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार , भाविक देवीचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर होते. दुपारी गणपती पॉइंटजवळ असताना,( एमएच १५ बीएन ०५५५) चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कारने संरक्षक कठडा तोडला आणि थेट खोल दरीत कोसळली. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून, मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही.या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घाटाच्या काही भागातील संरक्षक भिंतींचे काम अपूर्ण असल्यामुळे हा अपघात घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संरक्षणाची पुरेशी व्यवस्था नसताना या रस्त्यावरून वाहतूक सुरू असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या भीषण अपघातामुळे सप्तशृंगीगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

![]()















