25 मिनिटांत दहशतवाद्यांची 9 ठिकाणे उध्वस्त

वृत्तसंस्था : पहलगाम हल्ल्यात पाकिस्तान मध्ये ट्रेन झालेल्या दहशतवाद्यांनी अत्यंत निर्दयीपणे धर्म विचारत महिला लेकींच्या डोळ्यासमोर 26 पुरुषांना गोळ्या घातल्या. यामध्ये अनेक महिलांचे ‘सिंदूर’ या नराधम अतिरेक्यांनी पुसले आणि भारताबरोबरच जग संतापले. आज 14 दिवसांनी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत आपल्या लेकींचा बदला घेत जगाला हे दाखवून दिलं की भारत दहशतवाद्यांच्या कुरघोडीला चोख प्रत्युत्तर देऊ शकतो.भारताकडे वाईट नजरेने पहाल तर कुठलीही तमा बाळगणार नाही. हा मेसेज देखील ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे भारताने जगाला दिला. त्याच सोबत सेनेच्या पत्रकार परिषदेतून आणखी एक ‘सायलेंट मेसेज’ जगाला देण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरची इनसाईड स्टोरीची माहिती पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी दिली आहे. महत्वाचे म्हणजे ऑपरेशन सिंदूर संदर्भातील माहिती देताना भारतीय लष्कराच्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी यांची प्रमुख भूमिका होती. त्यांनी जगासमोर भारताच्या कारवाईची माहिती देत भारतातील नारीशक्ती आणि धार्मिक ऐक्य दाखवले.हा सायलेंट मेसेज भारताने जगभरात पोचवत धार्मिक उन्माद माजवणाऱ्या पाकिस्तानला त्याची लायकी दाखविली.एका मुस्लिम महिला अधिकाऱ्याची निवड करून भारताने सामाजिक ऐक्याचं आणि सर्वधर्म समभावाचं उदाहरण दिलं. त्याचबरोबर भारताने दोन महिला अधिकाऱ्यांना माहिती देण्याची जबाबदारी देऊन महिलांच्या सामर्थ्याचा जागतिक स्तरावर संदेश दिला. आजच्या पत्रकार परिषदेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी,विंग कमांडर व्योमिका सिह,परराष्ट्रीय सचिव विक्रम मिस्त्री यांनी एअर स्ट्राईकची सविस्तर माहिती दिली.
सोफिया कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 1.05 ते 1.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत ऑपरेशन सिंदूर पूर्ण करण्यात आले. पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेले निष्पाप नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी हे ऑपरेशन राबविण्यात आले. एकूण नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करून ती पूर्णपणे उध्वस्त करण्यात आली.
दहशतवाद्यांची भरती, त्यांना प्रशिक्षण, लाँच पॅडही होते. ही दहशतवादी ठिकाणे पाकिस्तानसह पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये आहेत. या ठिकाणांची निवड विश्वसनीय गुप्तचर माहितीच्या आधारे करण्यात आली. जेणेकरून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडता येईल. सामान्य नागरिकांना काहीही नुकसान होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यात आले.अवघ्या 25 मिनिटांमध्ये 9 सेंटर उध्वस्त करण्यात आले.
भारतीय सशस्त्र दलांची कारवाई ‘लक्ष्य केंद्रित आणि विचारपूर्वक’ होती. तसेच, ही कारवाई आणखी वाढू नये याची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. मुख्य म्हणजे पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच एक व्हिडीओ दाखविण्यात आला. या व्हिडीओमध्ये 2001 मध्ये ससंदेवर झालेला दहशतवादी हल्ला ते 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये दाखवण्यात आली. यासोबतच पुलवामा हल्ल्याची दृश्य दाखविण्यात आली. असे अनेक व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखवत भारतीय लष्कराने दहशतवाद्यांसह पाकिस्तानला थेट इशारा दिला.

कोण आहेत सोफिया कुरेशी
कर्तबगार अधिकारी अशी कर्नल सोफिया कुरेशी यांची ओळख आहे. सोफिया यांचं लहानपणापासूनच वायुसेनेत दाखल होण्याचं स्वप्न होतं. त्या मूळच्या गुजरातच्या रहिवासी आहेत. त्या भारतीय वायुसेनेत हेलिकॉप्टर पायलट आहेत. बायो-केमिस्ट्री या विषयात त्यांनी पदवी घेतली आहे. १९९९ मध्ये चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून सोफिया यांची भारतीय लष्करात प्रवेश केला. सर्वात उल्लेखनीय म्हणजे बहुराष्ट्रीय लष्करी सराव फोर्स-१८ मध्ये भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. पुण्यात झालेल्या फील्ड ट्रेनिंग सरावात सहभागी झालेल्या १७ देशांमधील तुकड्यांमध्ये त्या एकमेव महिला प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी ४० सदस्यांच्या भारतीय तुकडीचे नेतृत्व केले होते. सोफिया कुरेशी यांनी २००६ मध्ये काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतही काम केले आहे. सोफिया यांचे आजोबा सैन्यात होते आणि त्यांचे पतीदेखील मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमधील लष्करी अधिकारी आहेत.

कोण आहेत व्योमिका सिह
सशस्त्र दलात सामील होणाऱ्या व्योमिका या त्यांच्या कुटुंबातील पहिल्या सदस्य आहेत. १८ डिसेंबर २०१९ रोजी त्या फ्लाइंग ब्रांचमध्ये कायमस्वरूपी कार्यरत झाल्या.संवेदनशील आणि अतिजोखमीच्या परिसरात काम करण्याचा अनुभव असलेल्या त्या पायलट आहेत. त्यांनी २५०० हून अधिक तास उड्डाण केले आहे. जम्मू-काश्मीर आणि ईशान्येसह काही कठीण भूभागात त्यांनी चेतक आणि चीता यासारखी हेलिकॉप्टर्स चालवली आहेत. त्यांनी अनेक बचाव मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये अरूणाचल प्रदेशातील मोहिमेचे त्यांनी नेतृत्व केले होते. हे ऑपरेशन उंचावर, कठीण हवामानात आणि दुर्गम ठिकाणी करण्यात आले होते.२०२१ मध्ये २१ हजार ६५० फूट उंचीवर असलेल्या माउंट मणिरंग इथे त्या महिला गिर्यारोहण मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.

![]()















