खंडणी मागितली 1 कोटींची घेतले 15 लाख

नाशिक : नाशिकमध्ये भरदिवसा एका व्यावसायिकाच्या अपहरणाची फिल्मी स्टाईल घटना घडली होती. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते मात्र पोलिसांनी अत्यंत अवघड परिस्थितीत त्या अपहरण करणाऱ्यांना गजाआड करण्यात यश मिळविले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पुणेहायवे वरील काठे सिग्नलजवळून दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास व्यावसायिक निखिल प्रदीप दर्यानाणी जात होते यादरम्यान अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या कारच्या (एमएच 16 सीई 2020) दरवाजाची काच वाजवून बोलायचे आहे. असे सांगत बळजबरीने कार मध्ये बसले. तेथून नंदिनी नदीच्या पुलाजवळ आणत पिस्तुल दाखवून जीवे मारण्याची धमकी देत एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.त्यानंतर त्यांनी कार मुबंईच्या दिशेने नेली. यादरम्यान विल्होळी जवळ त्यांचा अजून एक साथीदार दुसऱ्या कारने आला. त्याने अपहरण केलेल्या कारचा ताबा घेत घोटी मार्गे भंडारदरा रस्त्याने पुढे निर्जन ठिकाण गाठले. यावेळी प्रदीप दर्यानाणी यांना बळजबरीने कारच्या खाली उतरवून भीती दाखवण्यासाठी त्यांनी त्यांच्या दिशेने पिस्तुल रोखत हवेत दोन गोळ्या झाडल्या.गोळीबाराने घाबरून गेलेले दर्यानाणी यांनी तातडीने त्यांच्या मोबाईलवरून त्यांचा भाऊ नवीन यास संपर्क साधला. त्याला सर्व प्रकार सांगून एका रिक्षामधून आलेल्या व्यक्तीला उपनगरजवळ पंधरा लाख रुपये देण्यास सांगितले. त्या साथीदारांने रक्कम घेतल्यानंतर अपहरण करणाऱ्या व्यक्तींनी रात्री दर्यानाणी यांना फाळके स्मारक परिसरात आणले यानंतर संधीचा फायदा घेत दर्यानाणी यांनी पळ काढला. आणि स्वतःची सुटका केली. यादरम्यान त्यांची कार मध्यरात्री गुन्हे शाखेला फाळके स्मारक जवळ मिळून आली.या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांना तातडीने आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या प्रमाणे गुन्हे शाखेच्या युनिट -1 च्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरवात केली व आपले खबरी देखील कामाला लावले यादरम्यान पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांना गुप्त खबऱ्या मार्फत समजले की संशयित आरोपी नाशिकच्या विल्होळी परिसरात आले आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली विल्होळी परिसरात सापळा रचत महंमद अन्वर सय्यद ( वय 30,रा नानावली, नाशिक) व सादिक लतीफ सय्यद (वय 39 रा. लेखानगर, नाशिक) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 2 लाख 88 हजार रुपये रोख व मोबाईल असा एकूण 3 लाख 8 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटा सारखे बोलू लागले.निखिल दर्यानाणी यांच्या भावाच्या दुकानात काम करणारे अल्फरान शेख,अहमद शेख यांनी निखिल दर्यानाणीबाबत माहिती पुरवली त्यानंतर निखिल यांचे अपहरण करून त्यांना जिवंत सोडण्यासाठी 1 कोटींची खंडणी मागत 15 लाखांची खंडणी घेतल्याचे कबूल केले. पोलिसांनी लागलीच अल्फरान अशपाक शेख (25 रा चौकमंडई भद्रकाली नाशिक) व अहमद रहीम शेख ( 25 रा. वडाळा गाव नाशिक) यांना ताब्यात घेण्यात आले.


![]()















