भाईगिरी करणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

नाशिक : शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता गावगुंड सरळ-सरळ हातात तलवारी घेत दहशत निर्माण करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.उपनगर परिसरातील एका बेकरीमध्ये खाण्याच्या बिलावरून वाद झाला आणि संतापलेल्या दोघा तरुणांनी हातात तलवारीसारखे धारधार शस्त्र घेत दुकानातील काचा व इतर साहित्याची तोडफोड करत दहशत माजविली.
त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात या गावगुंडांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांची परिसरातून वरात काढली. मिळालेल्या माहितीनुसार पवन मुकुंद अहिरे (वय 20,आम्रपाली झोपटपट्टी) संजय गौतम गवळी (वय 21 एकलहरा गेट) हे दोघे तरुण नाश्ता करण्यासाठी आले होते. नाश्ता झाल्यानंतर बिल देण्यावरून त्यांनी कामगारांबरोबर वाद घालत घटनास्थळावरून निघून गेले. मात्र काही वेळानंतर हे युवक पुन्हा बेकरीमध्ये आले. यावेळी त्यांच्या हातात तलवारी होत्या. त्यांनी शिवीगाळ करत काऊंटर, फ्रीज, काचेचे रॅकची तोडफोड केल्याने दुकानात असलेले कामगार, गिऱ्हाईक घाबरले व पळापळ सुरू झाली. त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे प्रभाकर सोनवणे, शशिकांत पवार यांनी घटनास्थळी धाव घेत दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासत अवघ्या काही तासात संशयितांची मुसक्या आवळत त्यांची परिसरातून वरात काढली पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

![]()















