बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन मुंबईत चौघांचा मृत्यू झाला असल्याची बातमी ताजी असतानाच, नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर

नाशिक : काही दिवसांपूर्वी मुंबई परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली होती यामध्ये बिर्याणी खाल्यानंतर कलिंगड खाल्याने एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच नाशिकमधून देखील हादरवणारी व तितकीच धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका वीस वर्षीय तरुणाने अंघोळीचा साबण खाल्ल्याने मृत्यू झाल्याचे समजते. अथर्व द्विवेदी (रा चेतना नगर) असे त्या तरुणाचे नाव आहे. अथर्वने नकळतपणे आंघोळीचा साबण खाल्ल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अथर्व हा ‘स्पेशल चाईल्ड’ असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही घटना अधिकच संवेदनशील ठरत असून, त्याने साबण का खाल्ला? यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, नेमकी घटना कशी घडली याचा शोध घेतला जात आहे. तसेच, वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे अथर्वच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

![]()















