गरज असेल तरच घराबाहेर पडा

नाशिक : नाशिक येथे कामासाठी असलेल्या ३७ वर्षीय शिवाजी बबन कांबळे यांचा परभणीत साडूच्या घरी भेटण्यासाठी गेले असताना दिवसभर उन्हात फिरून चक्कर आल्याने उष्माघात होवून मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या भावाने पोलीस स्टेशनला दिली असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मूळचे परभणीचे असलेले मयत शिवाजी बबन कांबळे हे नाशिक येथील पिंगळे मळा येथे सध्या वास्तव्यास आहेत. २४ एप्रिलला सकाळी ते आपल्या कुटुंबासह त्यांचे साडू यांना भेटण्यासाठी परभणीत आले होते. दिवसभर बाहेर फिरल्यावर त्यांना चक्कर आली आणि ते एका खड्ड्यात पडलेल्या अवस्थेत सापडले. त्यांची शोधाशोध केल्यांतर ते सापडले यावेळी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.दरम्यान दिवसभर उन्हात फिरल्याने त्यांना चक्कर आली आणि उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांचे बंधू महादेव कांबळे यांनी नानल पेठ पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस ठाण्यात त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान परभणीचे तापमान मागच्या आठवडा भरापासून ४० पार गेले आहे दोन दिवसांपासुन तापमान हे ४२ अंशावर गेले आहे त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे मात्र त्यातच दिवसभर उन्हात फिरल्याने शिवाजी कांबळे यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असून नागरिकांनी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत खूपच गरजेचे असल्यास सर्व उपाययोजना करूनच बाहेर पडावे असे आवाहन ही प्रशासनाने केले आहे.

![]()















