दोन दिवसांचा दौरा तीन तासात घेतला आटोपता

नाशिक : आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यानिमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा दौरा होणार होता. सुरवातीला गेल्या 15 व 16 ला राज ठाकरे येणार होते मात्र हा दौरा रद्द झाल्यानंतर 19 आणि 20 मेची तारीख ठरली मात्र हा दौरा देखील रद्द झाला .अखेर 26 तारखेचा मुहूर्त ठरला. आणि महिनाभरापासून वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला मुख्य म्हणजे हा दौरा दोन दिवसांचा होता.त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली असताना मात्र तीन तासातच नाशिक दौरा उरकून राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. यामुळे स्थानिक नेत्यांबरोबरच कार्यकर्ते देखील संभ्रमात पडले. राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज ठाकरे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानमंत्र देतील व पुढील तयारीची दिशा ठरवली जाईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी शहरात अनेक ठिकाणी झेंडे, बॅनर लावण्यात आले होते.मनसे सरचिटणीस दिनकर पाटील, डॉ प्रदीप पवार, सलीम शेख शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, धीरज भोसले यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. राज ठाकरे यांचे सकाळी अकरा वाजता शहरात आगमन झाले दुपारी त्यांचे चांडक यांच्या निवासस्थानी भोजन झाले. यादरम्यान पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली मात्र या दरम्यान मुंबईहुन कोणाचा फोन आला आणि राज ठाकरे यांनी मुंबईकडे प्रस्थान केले. त्यामुळे तब्बल महिनाभरापासून त्यांची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना ना भेट मिळाली ना चर्चा करण्याची संधी त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीबाबत चर्चेची शक्यता व्यक्त करण्यात येत होती मात्र त्यावर देखील राज ठाकरे काहीही बोलले नाहीत. अखेर फक्त सेल्फी, फोटो काढण्यातच कार्यकर्त्यांनी धन्यता मानली. मात्र यामुळे राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा झाली.

![]()















