ऑपरेशन सिंदुर अंतर्गत भारतीय सैन्य दलाने केली मोठी कारवाई

वृत्तसंस्था : पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला काय उत्तर देणार याकडे जगाचं लक्ष लागलं होतं. ज्यानंतर एका गुप्त मोहिमेच्या अंतर्गत एअर स्ट्राईक केला आहे. भारतीय सैन्य दलानं जम्मू काश्मीर मधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये नऊ ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या मुलभूत ठिकाणांवर हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केलं. ज्या ठिकाणावरुन भारताविरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली त्या नऊ ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. रात्री १ वाजून ४४ वाजता हा स्ट्राईक करण्यात आला.उल्लेखनीय बाब म्हणजे, या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पचं अचूक लक्ष्य साधलं. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.



![]()















