भारत सोडावा लागण्याची शक्यता

नाशिक : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद सर्वत्र उमटत असतांना भारत सरकारने काही कठोर निर्णय घेतले असून केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला आहे.एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहता कामा नये. अश्या सूचनांच सर्वच राज्य शासनाना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीस प्रशासनाला कठोर पाऊले उचलण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर 48 तासात देश सोडण्याच्या सूचना केंद्राने केल्याने त्यानुसार शोधमोहीम सुरू केली असता शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सहा पाकिस्तानी महिलांकडे दीर्घकालीन मुदतीचा व्हिसा आहे. त्या महिला भारताच्या सुना असून त्यांचे माहेर पाकिस्तानचे आहे. गेल्या 20 वर्षांपासून त्या भारतात राहत आहेत.त्यांना मुले देखील आहेत त्या मुलांचा जन्म भारतात झालेला असल्याने ते भारतीय असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या सहा महिलांना भारताचे नागरिकत्व अजून मिळालेले नाही. त्यांच्याकडे पाकिस्तानी नागरिकत्व आहे. मात्र आता केंद्र शासनाच्या कडक आदेशानुसार त्यांचे सासर जरी नाशिकचे असले तरी त्या महिलांना देश सोडावा लागू शकतो. असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. मात्र स्थानिक पोलीस आणि फॉरेन रजिस्ट्रेशन कार्यालयाचे “बारीक लक्ष” त्यांच्यावर आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ स्तरावर कळविण्यात आलेली आहे

![]()















