एक्झिटपोलमुळे वाढली उमेदवारांची धाकधूक….

संपादकीय
लोकसभेच्या सातव्या व शेवटच्या टप्प्याचे मतदान संपताच विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात भाजपा प्रणित एनडीएला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र महाराष्ट्रात नेमकं काय होणार ? कोणाचं पारड जड ठरणार ? याबाबत मतभिन्नता दिसून येत आहे. म्हणजेच महाराष्ट्राबाबत अभ्यासक देखील कन्फ्युज दिसत आहेत. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभा व नाशिक लोकसभा मतदारसंघात जे वाढीव मतदान झालं ते नेमकं कुणाला झालं हे सांगणे कठीण जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात 61 टक्के इतकं मतदान झालं. तर अनेक घडामोडी, नाराजी नाट्य घडत महायुतीच्या वतीने शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळाली. मात्र यामध्ये खूप उशीर झालेला होता. तर महाआघाडीच्या वतीने ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांना प्रचाराला भरपूर वेळ देखील मिळाला. मात्र शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात जातीने लक्ष घालून हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा करत निवडणुकीमध्ये रंगत आणली. त्याचबरोबर नाशिकच्या मैदानात स्वामी शांतीगिरी महाराज यांनी उडी मारल्याने या मतदारसंघात रचौरंगी लढत रंगली. मुख्य म्हणजे शांतीगिरी महाराज यांचा भक्त परिवार सिन्नरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सिन्नर याठिकाणी नेमकं मतदान राजाभाऊ वाजे यांना झालं की त्यामध्ये मोठा वाटेकरी म्हणून शांतीगिरी महाराज देखील होते हे सांगणे कठीण आहे मात्र सिन्नरकरांनी वाजे यांना भरघोस मतदान केलं असेल तर हा मतदारसंघ वाजे यांना तारक ठरू शकतो.त्याचबरोबर सुरवातीला नाशिक शहरात कमी टक्केवारी वाटणारी मात्र नंतर टक्केवारी वाढत गेल्याने नेमकं मतदारांनी आपलं दान गोडसे की वाजेच्या पदरात टाकलं हे सांगणे देखील कठीण आहे. मात्र या लढाईत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात सहानुभूती दिसली याचे पर्यावसन मतांमध्ये झाले असेल का ? तर मोदी यांची सुप्त लाट असल्याची देखील चर्चा होती. मात्र हे देखील 4 जूनला कळेलच. नाशिकमध्ये आपल्या अस्तित्वाची लढाई ही दोघा शिवसेनेसाठी महत्वाची ठरणार आहे.काल पासून सुरू असलेल्या एक्झिटपोल मध्ये नाशिक लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या निवडणुकीत हेमंत गोडसे पुन्हा एकदा बाजी मारतात का? अथवा पहिल्यांदाच खासदारकीला उभे असलेले राजाभाऊ वाजे जायंट किलर ठरतात का ?अथवा शांतीगिरी महाराज यांच्या रूपाने नाशिक लोकसभेत एक नवा अध्याय सुरू होतो. ते 48 तासात नाशिककरांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या नागरिकांना देखील कळणार आहे.

तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदारांनी नवा इतिहास घडवला आहे .संपूर्ण महाराष्ट्रात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भरघोस म्हणजेच 66.75 टक्के इतके मतदान झाले. या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार डॉ भारती पवार या आहेत त्या केंद्रात राज्यमंत्री देखील असून त्यांच्या समोर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे उमेदवार आहेत. मुख्य म्हणजे निवडणूक घोषित झाल्यापासून ही निवडणूक कांद्याभोवती फिरताना दिसली. मात्र कांदा आणि वाढीव मतदान कोणाला रडवणार हे 4 जुनलाच स्पष्ट होणार. सुरू असलेल्या एक्झिटपोल नुसार ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे म्हणजेच याठिकाणी शरद पवार यांच्या मागे मतदारांची सहानुभूती होती. व कांदा देखील कोणाला रडवणार हे पाहणे महत्वाचे ठरेल, मात्र वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर पडून डॉ भारती पवार या पुन्हा बाजी मारतील अथवा भास्कर भगरे हे जायंट किलर ठरतात याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. मात्र आता मतदार हा 4 जुनची वाटत पहात असून नेमकं कोण बाजी मारणार अथवा एक्झिटपोल खरे ठरणार हे त्याचदिवशी कळेल. या दोन्ही जागा महायुतीच्या हातून गेल्यास महायुतीला हा मोठा धक्का असेल तर सध्या महाआघाडीकडे गमावण्यासारखे काहीच नाही हे विशेष….


![]()














