ना सावलीसाठी व्यवस्था ,ना प्यायला पाणी,मतदारांचा संताप

नाशिक: शहराच्या कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार पोहचला आहे, यामुळे घराबाहेर निघाल्यानंतर नागरिकांना तीव्र झळांचा चटका जाणवत असताना आज जेष्ठ नागरिक, महिला वर्ग, तरुण मतदान करण्यासाठी घराबाहेर पडला खरा मात्र मतदान केंद्रावर कुठल्याही सुविधा नसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. मतदान करण्यासाठी रांगा मात्र उन्हापासून बचाव करण्यासाठी कुठलाही मंडप नाही. त्याचबरोबर अनेक ठिकाणी तर पिण्याच्या पाण्याची देखील सोय नव्हती. यामुळे मतदार असलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय बघायला मिळाली. काही जेष्ठ नागरिकांबरोबर घरातील व्यक्ती आल्या होत्या त्यांनी जेष्ठ नागरिकांना झाडाखाली बसवत स्वता मतदानाच्या भल्या मोठ्या रांगेत उभे राहत नंबर लावल्याचे चित्र बघायला मिळत होते. या दरम्यान कुठल्याही व्यक्तीला चक्कर आल्यास, अथवा काही घटना घडल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न मतदार करत होते.यामुळे नागरिकांची चीड-चीड देखील होत होती. भली मोठी रांग, उन्हापासून वाचण्यासाठी कुठलाही मंडप नसल्याने, बसायला खुर्च्या नसल्याने काही मतदार बघू संध्याकाळी म्हणत घराकडे परतत देखील होते. एकीकडे मतदान वाढविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, निवडणूक आयोग मतदानाला “या म्हणत” जाहिरातींवर करोडो -कोटी रुपये खर्च करताना दिसते. मग मतदान केंद्रावर कुठल्याही सुविधा नसतील तर मतदानाचा टक्का वाढणार तरी कसा ? अशी चर्चाच मतदान केंद्रांवर नागरिकांमध्ये सुरू होती.

![]()














