जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रांताधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच ठाण मांडले.

नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रस्तावित 66 किलोमीटरच्या रिंग रोडसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला आता राजकीय वळण लागल्याचं चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रिंग रोडच्या 365 हेक्टर जमीन संपादनासाठी गेल्या शनिवारी मातोरी आणि मुंगसरे येथे मोजणी प्रक्रिया सुरू होती. यावेळी ग्रामस्थांनी विरोध केला असता, प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्या उपस्थितीत पोलिसांनी शेतकऱ्यांच्या घरात शिरून महिलांना फरफटत बाहेर काढले आणि मारहाण केली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला असताना या मारहाणीचे पडसाद आता जिल्हाधिकारी कार्यालयात उमटले आहे. या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. राऊत यांनी थेट प्रांताधिकारी पवन दत्ता यांना फोन लावून जाब विचारला असून, पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्याकडेही तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर, ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. मात्र यावेळी जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रांताधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने राऊतांनी तेथेच ठिय्या मांडला. यावेळी संजय राऊत यांनी प्रशासन आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले तेव्हा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे खरीप आढावा बैठकीसाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी शिष्टमंडळाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, “जिल्हाधिकारी बोलावतात असे सांगून प्रांताधिकारी पवन दत्ता पळून गेले आहेत, त्यांना आधी समोर आणा,” अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी आणि राऊत यांनी घेतली. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच बसून पत्रकारांशी बोलताना खा.राऊत म्हणाले की, शहराचा विकास व्हायलाच हवा, मात्र शेतकऱ्यांची घरे, उदरनिर्वाहाची शेती आणि सामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त करून विकास साधला जाणार असेल, तर तो अन्यायकारक आहे. “या नुकसानाची भरपाई काय? पोलिसांना पोलिसी कारवाईसाठी पाठवले आहे की नागरिकांवर दडपशाही करण्यासाठी?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मी कधीही सरकारी कार्यालयात जात नाही, पण हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. सीता समान माता-भगिनींना घरात शिरून मारहाण केली जाते. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्याकडे करणार आहे. मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करणार आहे. कसले अधिकारी नेमले आहेत तुम्ही? जबरदस्तीने जमिनी घेऊ नका. मी पोलीस किंवा ईडीला घाबरत नाही. याला धमकी समजायची असेल तर खुशाल समजा,” असा इशारा त्यांनी सरकारला दिला. रिंग रोडसारख्या मोठ्या प्रकल्पांबाबत सर्वपक्षीय चर्चा होणे आवश्यक असल्याचे सांगत राऊत म्हणाले, “शहराचा विकास केवळ भाजपच करत आहे का? खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन निर्णय व्हायला हवा होता. असेही संजय राऊत म्हणाले.

![]()















