संबंधित बैठकीचा घोषणेचा आणि काँग्रेसचा संबंध नाही असे सांगत संबंधित नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार-कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाआघाडीत घेण्यावरून कॉग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असतानाच आणि हा विषय wait and watch वर ठेवलेला असताना नाशिक शहरात मात्र महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यात मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार असल्याची घोषणा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला काँग्रेसच्या नेत्यांचीही उपस्थिती होती.यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) डावे पक्ष, व मनसेचे प्रतिनिधी एकत्र आले होते. या सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, या बैठकीस मनसे सरचिटणीस दिनकर पाटील, माकपा प्रदेश सरचिटणीस तानाजी जायभावे, मनसे उपनेते सलीम शेख, मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, माकपा प्रदेश सचिव राजू देसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) गजानन शेलार, शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष डी.जी. सूर्यवंशी, काँग्रेसचे ज्ञानेश्वर गायकवाड, माकपा राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी.एल.कराड, काँग्रेसचे प्रशांत दिवे, सिटूचे सीताराम ठोंबरे, माजी आमदार वसंत गीते, गोकुळ पिंगळे, माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.मात्र यावर मुंबईत कॉग्रेस प्रदेशाध्यक्षांनी संताप व्यक्त करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची ही भूमिका पक्ष शिस्तीचा भंग असल्याचे खडसावून सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत. पक्षाने या बैठकीसाठी कोणताही प्रतिनिधी पाठवला नसल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. काँग्रेसचा या बैठकीशी कोणताही संबंध नसल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी ठामपणे सांगितले. मनसेकडून युतीचा प्रस्ताव आल्यास त्यावर राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीच्या सहयोगी पक्षांमध्ये चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय केवळ राष्ट्रीय स्तरावरच घेतला जाईल, मात्र पत्रकार परिषद घेणारे स्थानिक नेते तोंडघशी पडल्याची स्थिती असताना येत्या दिवसात महाआघाडीतील स्थानिक नेते काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. त्याचबरोबर मनसेला महाआघाडीत सामील करण्यास कॉग्रेस अनुकूल होईल का ? याकडे राजकीय तज्ञांचे लक्ष लागून आहे मात्र या घटनेची जोरदार चर्चा नाशिक जिल्ह्यात सुरू होती. त्यामुळे महाआघाडी व मनसे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे चित्र आहे

![]()















