वाढत्या गुन्हेगारीने शहर दहशतीखाली

नाशिक : शहरातील गुन्हेगारीने आता टोळी युद्धाचे स्वरूप घेतले असून पंचवटी परिसरातील पेठरोडवरील राहुलवाडीत मध्यरात्री पूर्ववैमनस्यातून एका युवकावर गोळीबार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली असून या गोळीबारात युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव सागर जाधव असून तो खंडणी प्रकरणातील संशयित असल्याची माहिती मिळत आहे.त्याचबरोबर तो ‘उघडे’ नामक गॅंगचा सक्रिय सदस्य असल्याचे समजते.सागर जाधव हा त्याच्या सहकाऱ्यांसोबत एका ओट्यावर बसलेला असताना याच परिसरात राहणाऱ्या दोघा तरुणांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.या गोळीबारात सागर जाधव याच्या गालातून गोळी आरपार गेली. तर दुसरी गोळी मानेमध्ये अडकली. सागर यास पुढील उपचारासाठी अपोलो या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळी युद्ध झाले होते. या गोळीबारात त्याच टोळीतील काही संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी दाखल झाले. या घटनेनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

![]()















