आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलचा सामना ९ मार्चला होणार

नाशिक : भारताने ऑस्ट्रेलियाचे पानीपत करत अखेर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. विराट कोहलीने यावेळी ८४ धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम गाजवला. दुबईतल्या उपांत्य सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सनी पराभव केला. भारताच्या या विजयात फलंदाज आणि गोलंदाजांनीही आपला ठसा उमटवला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी व्या षटकांतच विजयासाठीचं 265 धावांचं लक्ष्य गाठले. भारताकडून विजयी लक्ष्याच्या पाठलाग करताना विराट कोहलीनं मोलाची भूमिका बजावली. त्यानं श्रेयस अय्यरच्या साथीनं 91 धावांची, अक्षर पटेलच्या साथीनं 44 धावांची आणि लोकेश राहुलच्या साथीनं 47 धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या दिशेनं नेलं. विराट कोहलीने 84, श्रेयस अय्यरने 45, अक्षरने 27 धावांची आणि राहुलने 42 नाबाद धावांची खेळी उभारली. तत्पूर्वी, दुबईच्या मैदानात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला शमीसह भारतीय फिरकीने काही प्रमाणात जखडून ठेवले. सलामीवीर ट्रेव्हिस हेडच्या 33 चेंडूंमधील आक्रमक 39 धावांनंतर कांगारुंना भारताने वेसण घातली होती. मग स्टीव्ह स्मिथ 96 चेंडूंमध्ये 73 संयमी तरअलेक्स कॅरीने 57 चेंडूंमध्ये 61 धावांची आक्रमक खेळी करत संघाला अडीचशे पार पोहोचवलं. भारताकडून शमीने तीन तर वरुण चक्रवर्ती आणि डावखुरा स्पिनर रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव 49.3 षटकांत 264 वर आटोपला.आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे नववे पर्व संपण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. २०१७ नंतर प्रथमच म्हणजे आठ वर्षांनी आलेल्या या स्पर्धेच्या आयोजनाचा मान यंदा पाकिस्तानला देण्यात आला. पण, भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळणार यावर आधीच सहमती झाली होती. भारत उपांत्य फेरीत न पोहोचल्यास स्पर्धा पुन्हा पाकिस्तानात शिफ्ट होणार होती. पण तसे काही झाले नाही. भारताने दुसऱ्या साखळी सामन्यात पाकिस्तानचाच पराभव करुन उपांत्य फेरीचे स्थान निश्चित केले. त्यामुळे आपसूकच उपांत्य फेरीचा सामना दुबईत होणार हे निश्चित झाले.
भारताने आता उपांत्य सामन्यात विजय मिळववल्याने अंतिम सामनाही दुबईतच रंगणार आहे. त्यामुळे तब्बल २९ वर्षांनी आयसीसी स्पर्धा आयोजनाचा मान मिळालेल्या पाकिस्तानची निराशा झाली आहे. कारण आयोजनाची संधी मिळालेल्या साखळी सामन्यांपैकीही तीन सामन्यांवर पावसाच्या व्यत्ययामुळे पाणी फेरलं गेलंय. अशात आता अंतिम सामन्यात भारत पोहोचल्यामुळे केवळ एका उपांत्य फेरीच्या सामन्याच्या आयोजनावरच पाकिस्तानला समाधान मानावे लागले आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलचा सामना ९ मार्चला होणार आहे.

![]()














